पावसामुळे घरात पाणी शिरलेल्या नागरिकांना १० हजारांची मदत – अजित पवारांची घोषणा
पुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून, मुंबई, पुणे, कोकण, मराठवाडा आणि विदर्भ भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक भागांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेकांचे घरांमध्येही पाणी शिरले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे.
बारामती मतदारसंघात नुकसानीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा दौरा केला. तालुक्यातील सिद्धेश्वर निंबुडी येथे त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करत स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. घरात पाणी शिरलेल्या प्रत्येक कुटुंबाला १० हजार रुपयांची तातडीची मदत दिली जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
गावात पंचनाम्यांची प्रक्रिया सुरु
अजित पवारांनी नुकसानीच्या ठिकाणी रस्ते, कोसळलेली घरे, वाहून गेलेले वीज खांब आणि इतर पायाभूत सुविधांचे नुकसान पाहिले. स्थानिक शेतकरी आणि गावकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे पूर्ण करून मदत कार्य वेगाने राबवण्याचे निर्देश देण्यात आले.
"ज्यांच्या घरात पावसाचे पाणी शिरले आहे, त्यांना तात्काळ १० हजार रुपये देणार आहोत. लवकरच त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल," असे पवार यांनी स्पष्ट केलं. मात्र, कोणत्या निकषांनुसार ही मदत दिली जाणार, याबाबतची अंतिम माहिती लवकरच प्रशासनाकडून जाहीर केली जाईल.
बारामतीत नीराचा कालवा फुटल्यामुळे परिस्थिती गंभीर
बारामती तालुक्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. विशेषतः बारामती-इंदापूर रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. ढेकळवाडी आणि आजूबाजूच्या परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. साखरेवाडा आणि विजयनगर परिसरातील अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा फटका बसला आहे.
या सगळ्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीच्या उपाययोजनांचे आश्वासन दिले असून, नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे सांगण्यात आले आहे.
ताज्या अपडेटसाठी आमच्या वेबसाइटला भेट देत राहा.
0 टिप्पण्या